मुंबई(अनिल मुनीश्वर):—दि. ६ ऑगस्ट :—-
आज दुपारी सुमारे १.३० वाजता मंत्रालय, मुंबई येथे राज्याचे वनमंत्री मा. गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील वन विभागाशी संबंधित विविध प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. राजकुमार बडोले यांनी आपल्या मतदारसंघातील वन विभागामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांचा मुद्दा प्रभावीपणे उपस्थित करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. ही बैठक भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील वन विभागाच्या परवानग्या, विकास प्रकल्प आणि नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरातील विकासकामांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत आमदार राजकुमार बडोले यांनी सर्वप्रथम नवेगाव बांध येथील लोकहिताच्या व निस्तार अधिकाराच्या जमिनी वन विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अशी ठाम मागणी केली. या जमिनींवर स्थानिक ग्रामस्थांचे पारंपरिक हक्क असून, त्या वन विभागाकडे गेल्यास हजारो नागरिकांच्या हिताला बाधा निर्माण होईल, असे त्यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
त्यानंतर झाशीनगर उपसा सिंचन योजना वन कायद्याच्या विविध परवानग्यांमध्ये अडकून अनेक वर्षांपासून रखडली असल्याचे सांगून ही योजना तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. या योजनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असल्याने आवश्यक त्या वन परवानग्या त्वरित देण्याची विनंती त्यांनी केली.
याचबरोबर इटियाडोह जलाशयाचे अद्याप निर्गाळीकरण (निर्वणीकरण) झाले नसल्याने जलसाठ्याची क्षमता कमी झाली आहे, त्यामुळे जलाशयाचे तातडीने निर्गाळीकरण करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी आमदार बडोले यांनी केली.
वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे ग्रामीण भागात मनुष्यहानी आणि पीकहानीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या मनुष्यहानीबाबतच्या नुकसानभरपाईच्या शासन निर्णयात सुधारणा करण्याची आवश्यकता मांडली. विशेषतः रस्त्यावर किंवा दैनंदिन प्रवासादरम्यान वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यासही वारसांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन पीकहानीबाबत भरीव आणि वास्तववादी मोबदला देण्याची मागणीही केली.
स्थानिक पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या बुरूड समाजातील कारागिरांना नियमित व पुरेशा प्रमाणात बांबू उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून त्यांचा रोजगार टिकून राहील, अशी मागणी त्यांनी केली. तसेच ग्रामीण भागात अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा तुटवडा निर्माण होत असल्याने जलाऊ लाकडांचा पुरेसा व नियमित पुरवठा करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.
पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या नवेगाव बांध पर्यटनस्थळाच्या सर्वांगीण विकास आराखड्याला तात्काळ मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करत त्यांनी पर्यटन विकासामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे सांगितले.
या सर्व विषयांवर आमदार राजकुमार बडोले यांनी सविस्तर मांडणी केल्यानंतर वनमंत्री मा. गणेश नाईक यांनी संबंधित सर्व प्रस्तावांचा सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वन विभागाशी संबंधित प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. बैठकीला आमदार नाना पटोले,आमदार राजू कारेमोरे,नवेगाव बांधचे सुनील तरोणे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आवर्जून उपस्थित होते
या बैठकीमुळे अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, स्थानिक नागरिकांनीही या बैठकीकडे मोठ्या आशेने पाहिले आहे.









