
सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):—————- तालुक्यातील घोटी/डव्वा येथे राजे ग्रुप तर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याला माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले यांनी प्रमुख उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार बडोले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी विचार व्यक्त करताना आमदार राजकुमार बडोले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे जनतेचे, बहुजनांचे आणि सर्वधर्मसमभाव जपणारे होते. त्यांनी सर्व धर्मांचा आदर राखत न्याय, स्वाभिमान आणि लोककल्याण यावर आधारित आदर्श राज्यकारभार उभा केला. पराक्रमी योद्धा म्हणून त्यांची कीर्ती जगभर पसरली तर जनतेचा राजा म्हणून ते आजही प्रत्येकाच्या हृदयात विराजमान आहेत.
शिवजयंती साजरी करताना केवळ उत्सव न साजरा करता त्यांच्या विचारांचे जतन आणि संवर्धन करणे अधिक महत्त्वाचे आहे. आपली सांस्कृतिक परंपरा, ग्रंथसंपदा आणि वैचारिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. संत तुकाराम महाराजांच्या गाथेसारख्या साहित्याचा अभ्यास केल्यास आपल्या संस्कृतीची महानता लक्षात येते. त्यामुळे गावागावात वाचनालये, अभ्यासिका आणि सांस्कृतिक उपक्रम वाढवणे गरजेचे आहे असेही नमूद केले.
राजे ग्रुपने आयोजित केलेला हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी व उत्साहवर्धक असल्याचे सांगून आमदार बडोले यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.तसेच सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार दिलीप बन्सोड, पंचायत समिती सभापती चेतन वळगाये, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अविनाश काशिवार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गंगाधर परशुरामकर, भाजप जिल्हा महामंत्री प्रशांत शहारे,विवेक भेंडारकर, राजू पटले, दिनेश कोरे, सुधाकर ब्राम्हणकर आदी मान्यवर व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.









