गोंदिया(अनिल मुनीश्वर):——————————————————
समता सैनिक दल हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले संघटन असून, सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांच्या प्रसारासाठी दलाने ऐतिहासिक भूमिका बजावली आहे. आंबेडकरी चळवळीच्या प्रत्येक टप्प्यावर समता सैनिक दलाने संघर्षाची परंपरा जपली असून, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे काम सातत्याने केले आहे. जिल्ह्यातील अर्जुनी मो. तालुक्यातील नवेगाव बांध येथे समता सैनिक दलातर्फे करण्यात आलेल्या सत्कार प्रसंगी प्रतिपादन इंजिनीयर आनंद चंद्रिकापुरे यांनी केले.
समता सैनिक दल गोंदिया जिल्ह्याच्या वतीने
नवेगाव बांध येथे आयोजित विदर्भस्तरीय सैनिक संमेलन व वर्धापन दिन कार्यक्रमात उद्घाटक म्हणून आमदार अभिजीत वंजारी हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव चे सभापती यशवंत परशुरामकर प्रामुख्याने, इंजि. आनंद चंद्रिकापुरे, चरणदास उंदीरवाडे, सुनील तरोणे, रेखा वासनिक, भंते नागदीपंकर स्थावीर, अनिल दहीवले, व्यंकट खोब्रागडे, मधुकर रामटेके, पृथ्वी मोटघरे, संगप्रिय नाग, सुरेखा टेंभुर्णे, अजय अंबादे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
इंजि. चंद्रिकापुरे पुढे म्हणाले की, आजच्या काळातही समाजात असमानता आणि अन्यायाचे विविध प्रकार दिसून येतात. अशा परिस्थितीत समता सैनिक दलाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. युवकांनी संघटित होऊन सामाजिक परिवर्तनासाठी पुढे यावे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार समाज घडविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समता सैनिक दल गोंदियाच्या सर्व सैनिकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन मिथुन मेश्राम यांनी केले. प्रास्ताविक डॉ.अंबादे जी ओ सी , यांनी केले तर आभार मंजुषा वासनिक यांनी मानले. कार्यक्रमाला पूर्व विदर्भातील हजारो सैनिक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.









