सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):———— – 16 जानेवारी 2026
येथील नगरपंचायत हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी जागा राखीव ठेवण्यात यावी, या मागणीसाठी शिवजन्मोत्सव सोहळा समिती, सडक अर्जुनी यांच्या वतीने आज दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी प्रशासकीय अधिकारी मा. युगलकुमार दडेमल सर यांच्याकडे लेखी अर्ज सादर करण्यात आला.
या अर्जामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असून त्यांचे जीवन शौर्य, पराक्रम, प्रामाणिकपणा व उत्कृष्ट प्रशासनाचे प्रतीक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शहरातील नागरिक, युवक व बालकांमध्ये देशभक्ती, सामाजिक ऐक्य व प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने शहरात भव्य स्मारक उभारणे आवश्यक असल्याचे समितीने सांगितले.
अर्जामध्ये नगरपंचायतीच्या मालकीतील मध्यवर्ती व नागरिकांना सहज उपलब्ध होईल अशा जागेवर कायमस्वरूपी जागा राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. या स्मारकामुळे शहराची व तालुक्याची प्रतिष्ठा वाढेल तसेच ऐतिहासिक ओळख निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे सदस्य तथा गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज सादर करताना उपस्थित असलेल्यांमध्ये अनिकेत कापसे, विक्रम पुरी, रोशन गहाणे, रितेश खरोले, उमेश उदापुरे, शुभम एरणे, दिशांत खरोले, चीतेस शेंडे, गणेश मालदे, चंदन परिहार, आकीब शेख, नितेश कोरे, दीपक बडवाईक, अक्षय टेकाम, दिग्रेस टेंभुरकर, किशोर झिंगरे, ऋषी कावळे व विलास खेडकर यांचा समावेश होता.
प्रशासकीय अधिकारी मा. युगल कुमार दडेमल सर यांनी अर्ज स्वीकारून या विषयावर सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. शहरातील नागरिकांमध्ये या मागणीबाबत उत्साहाचे वातावरण असून लवकरच यावर ठोस निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








